Home Breaking News स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार..!

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार..!

447

*आराखडा तयार करा, उपयुक्तांचे आदेश 

बातमीदार: तुषार अतकारे -दीड वर्षांपासून कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे मुदत संपलेल्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका थांबल्या आहेत. मात्र दि 20 ऑगस्ट ला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश सर्व जिल्ह्याधिकारी यांना दिल्याने प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या नगर परिषद, नगरपंचायती व नवनिर्मित नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका घेण्याच्या तयारीला राज्य निवडणूक आयोग लागला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के व 243 झेड नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे व नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असते तसेच संविधानाच्या अनुच्छेद 243 आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम 41(1) नुसार नगरपरिषदांची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे.

देशात मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. पहिल्या कोरोना लाटेनंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या निवडणूक संपताच देशात दुसरी लाट आली. त्यामुळे मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. परन्तु सध्यस्थीतीत कोरोनाचा विळखा कमी झाला आहे.

प्रभाग रचना आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे यासाठी सध्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा असे आदेशीत करण्यात आले आहे. कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही दिनांक 23 ऑगस्ट पासून सुरू करण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे. प्रभाग रचना करताना त्याची गोपनियता न राखल्यामुळे व नियमांचे काटेकोर पालन न केल्यामुळे, प्रारूप प्रभाग रचनेविरूध्द हरकतींची संख्या, अंतिम प्रभाग रचनेविरुध्द दाखल होणाऱ्या रिट याचिकांची संख्यादेखील वाढते. त्यामुळे अशी अकारण उद्भवणारे न्यायालयीन प्रकरणे आणि या सर्वामुळे होणारा विलंब टाळणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

अनेक हवेसे-गवसे-नवसे येणाऱ्या निवडणुकीत गुढग्याला बाशिंग बांधायच्या तयारीत आहे. तिसरी लाट लक्षात घेता निवडणुका होणार की नाही या बाबत शाशंकता होती. मात्र निवडणूक आयोग निवडणूक घेण्याच्या तयारीला लागला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील सर्व जिल्ह्याधिकारी यांना दि 23 ऑगस्ट पासून क्षेत्र निश्चित करून प्रभागांच्या नकाशाचा कच्चा आराखडा तयार करून  निवडणूक आयोगाला तात्काळ कळविण्याचे आदेश उपआयुक्त अविनाश सणस यांनी दिले आहे.त्यामूळे वेळेतच निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.