वणी बातमीदार: संस्कृत ही केवळ एक भाषा नसून प्राचीन भारतीय ज्ञानसंग्रहाची किल्ली आहे. प्रदीर्घ पारतंत्र्याच्या काळात या भाषेपासून तुटलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी, वणी सारख्या सुदूर आदिवासीबहुल भागात संस्कृत भारती आणि आयोजक संस्था करीत असलेले कार्य निश्चितच अभिनंदनीय आहे. असे विचार दैनिक लोकमतचे प्रतिनिधी संतोष कुंडकर यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, प्राचीन भारतात विद्यमान असणाऱ्या विविध विद्यापीठांमध्ये धार्मिक अध्यात्मिक विषयांच्यासोबतच मानवी जीवनातील सर्वच विषयांवर उच्चतम शिक्षण दिले जात होते हे आता जगानेही मान्य केले आहे. त्या भारताच्या प्राचीन अज्ञानाला जाणून घ्यायचे असेल तर संस्कृत शिवाय पर्याय नाही.
संस्कृत भारती, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि आदर्श प्रशासकीय महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या आभासी संस्कृत सप्ताहात ते सहभागींना प्रोत्साहन देत होते. आज तिसऱ्या दिवशीच्या सादरीकरणात हांसुजा कृष्णा पुरवार हिने भगवद्गीतेचा बारावा तर रामटेक येथे राहणाऱ्या आदर्श प्रशासकीय महाविद्यालयाच्या साक्षी जोशी हिने पंधरावा अध्याय सादर केला.
लीना गुप्ताने निसर्ग कविता, आर्या अरविंद महालक्ष्मी हिने नवदुर्गा कवच स्तोत्र, वल्लभ अनिरुद्ध कुंभारे याने एकश्लोकी रामायण आणि इतर श्लोक, श्रावणी मनीष लाभे हिने संकष्ट नाशन स्तोत्र तर गायत्री सुमेध कोतपल्लीवार यांनी निर्वाण षटकम् सादर केले. लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थिनी यशश्री हरिहर भोयर हिने महाकवी अश्वघोष यांच्या जीवन आणि कार्याचा परिचय करून दिला. या आभासी संस्कृत सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत भाकरे, महेश पुंड यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.