Home Breaking News आता..30 नगरसेवक हाकणार वणी पालिकेचा गाडा

आता..30 नगरसेवक हाकणार वणी पालिकेचा गाडा

1217

4 सदस्यांचे भाग्य उजळणार
निर्णय बदलल्याने प्रशासनाची तारांबळ

राज्यातील महानगरपालीका व नगर परिषदांतील नगरसेवकांच्या संस्थेमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतलाआहे. सदस्य संख्येत 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला. यामुळे वणी नगरपरिषदेची सदस्य संख्या 4 ने वाढणार असून 30 नगरसेवक वणी पालिकेचा गाडा हाकणार आहेत. निर्णय बदलल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली असून इच्छुक 4 सदस्यांचे भाग्य उजळणार आहे.

गेल्या 10 वर्षात शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे नगरपरिषद हद्दीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातच मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे 2021 ची जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे लोकसंख्येची अपेक्षीत वाढ गृहीत धरून व नागरी विकास योजनांचा वेग वाढण्याची अपेक्षा ठेऊन ही वाढ करण्यात येणार आहे.

वणी नगरपरिषदेची नुकतीच हद्दवाढ झाल्याने लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे 4 नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या वेळोवेळी बदललेल्या निर्णयामुळे मतदार याद्यांचे प्रारूप बनविताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. आधी वार्ड निहाय नगरसेवक राहणार असा निर्णय होता. त्यामुळे प्रशासन वार्ड निश्चितीच्या कामाला लागले होते. हे काम सुरू असतानाच पुन्हा निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होणार असे जाहीर करण्यात आले.

नगर परिषदेची मुदत संपत असल्याने केव्हाही निवडणुकांचे बिगुल वाजु शकते. प्रभाग रचनेचे काम अंतीम टप्यात आले आहे. परंतू आता सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने जाहिर केल्यामुळे वणी नगरपरिषदेत आणखी 2 प्रभाग वाढवावे लागणार आहे. यापूर्वी 13 प्रभाग होते आता 15 प्रभाग तयार करावे लागणार आहे. प्रशासनाने यापूर्वी केलेली प्रभागनिहाय रचना बदलून नव्याने विकसित करावी लागणार आहे. यामुळे नगरपरिषद प्रशासनाची धावाधाव होण्याची शक्यता आहे.

यावेळी नगराध्यक्ष निर्वाचीत नगरसेवकांमधुनच निवडून जाण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांना विशेष महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक हवसे- गवसे निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागल्याचे चित्र शहरात बऱ्याच प्रभागात पहायला मीळत आहे.

बहुतेक राजकीय पक्ष सुद्धा आराखडे तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. राजकीय पक्षांच्या बैठका, मेळावे आयोजीत केले जात आहे. मात्र प्रभाग रचनेत अनपेक्षित बदल झाल्यास अनेकांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. दीवाळी नंतर पालिका निवडणुकीचे फटाके फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वणी: बातमीदार