● गुन्हा नोंद होण्यापूर्वीच अंतरिम जमानती साठी अर्ज
वणी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात धीरज सुराणा या व्यापाऱ्याने 147 शेतकऱ्यांचे जवळपास 1 हजार 935 क्विंटल सोयाबीन खरेदी केले होते. 24 तासात शेतकऱ्यांना चुकारे देने बंधनकारक असताना ‘त्या’ व्यापाऱ्याने रक्कम अदा न केल्याने बळीराजा सुलतानी संकटात सापडला आहे. या प्रकरणी APMC सचिवाने पोलिसात तक्रार नोंदवली असून गुन्हा नोंद होण्यापूर्वीच व्यापाऱ्याने न्यायालयात धाव घेत अंतरिम जमानती साठी अर्ज दाखल केला आहे.
वर्धमान ट्रेडिंग कंपनीत भागीदार असलेल्या धीरज सुराणा या व्यापाऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात 5 ते 7 जानेवारी व 10, 11 जानेवारीला 147 शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी केले. यात शेतकऱ्यांचे एक कोटी 13 लाख 78 हजार रुपयाचा चुकारा 24 तासात अदा करणे गरजेचे होते. अद्यापपर्यंत रक्कम थकविल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
बाजार समितीच्या प्रांगणात व्यापाऱ्याने चालवलेली ‘दडपशाही’ बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळ कसे खपवून घेतात हे कोडे आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बाजार समितीच्या सचिवांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
वणी पोलिसांनी या प्रकरणी आद्यप गुन्हा दाखल केला नाही. मात्र तथ्य तपासण्यात येत असून, शेतकरी, अडते, यांचे जाब-जवाब नोंदविण्यात येत आहे. कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होणार असल्याची भीती व्यापारी धीरज सुराणा याला असल्याने त्याने अंतरिम जमानती साठी न्यायालयात धाव घेतली आहे.
वणी: बातमीदार