Home Breaking News नवजात शिशू ला सोडून मातेची ‘आत्महत्या’

नवजात शिशू ला सोडून मातेची ‘आत्महत्या’

1000
Img 20240930 Wa0028

एक तपानंतर झाले होते गोंडस बाळ

वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथे वास्तव्यास असलेल्या 38 वर्षीय महिलेचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. एक तपानंतर तिला दिवस गेले, बाळंतपणासाठी ती माहेरी आली होती. तिने 29 जानेवारीला गोंडस बलिकेला जन्म दिला आणि अवघ्या 13 दिवसानंतर तिने नवजात शिशू ला वाऱ्यावर सोडून मृत्यूला कवटाळले.

गौतमी मनोहर ताकसांडे (38)असे मृतकाचे नाव आहे. तिचे लग्न केळापूर तालुक्यातील उमरी पाथरी येथील मनोहर ताकसांडे यांच्या सोबत 12 वर्षांपूर्वी रीती रिवाजाप्रमाणे झाले होते. त्यांना मुलबाळ नव्हते मात्र तब्बल 12 वर्षानंतर घरात पाळणा हलणार असल्याने ती आनंदात होती.

बाळंतपणासाठी गौतमी माहेरी राजूर ला आली होती. 29 जानेवारीला तिने गोंडस बलिकेला जन्म दिला. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच तिने आत्मघातकी निर्णय घेतला. गुरुवार दि. 10 फेब्रुवारी ला पहाटे आई-वडील झोपून असल्याची संधी साधून तिने मागील टिनाच्या शेड मध्ये गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

काही वेळानंतर तिचे बाळ रडायला लागल्यामुळे तिची आई खडबडून उठली, आजूबाजूला बघितले मात्र गौतमी दिसत नसल्याने शोधाशोध सुरू करताच गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

नवजात शिशूला एकटे सोडून मातेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. गौतमीच्या आत्महत्येने विविध प्रश्न उभे ठाकले आहेत. याप्रकरणी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून तपासात आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
वणी: बातमीदार