● शेतकऱ्यांना घातला होता कोट्यवधी चा गंडा
वणी: शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करून तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांचा चुकारा थकवला होता. त्यामुळे बाजार समिती सचिवाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तापसाअंती अखेर त्या दोन व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
वर्धमान ट्रेडिंग कंपनीत भागीदार असलेल्या धीरज सुराणा व त्याचा जामीनदार रुपेश नवरत्नमल कोचर यांनी संगनमत केले. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात 5 ते 7 जानेवारी व 10, 11 जानेवारीला 147 शेतकऱ्यांचे जवळपास 1 हजार 935 क्विंटल सोयाबीन खरेदी केले होते.
इनाम योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचा चुकारा, बाजार समितीची बाजार फी, शासनाची सुपरव्हिजन कॉस्ट फी आणि अडत्याची अडत असा एकूण 1 कोटी 15 लाख 26 हजार 46 रुपये ऑनलाइन जमा करणे गरजेचे होते. मात्र त्या व्यापाऱ्यांनी शेतकरी, बाजार समिती, शासन आणि अडते यांची फसवणूक केल्या प्रकरणी वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे गुन्हा नोंद होण्याच्या काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी अंतरिम जामीन मिळविण्याकरिता न्यायालयात धाव घेतली होती. मात्र अद्याप त्यांना जामीन मिळालेला नाही. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवाजी टिपूर्णे तपास करीत आहे.
वणी: बातमीदार