Home Breaking News नंदीग्राम एक्सप्रेस सुरू करण्यासाठी ‘क्रांती’…!

नंदीग्राम एक्सप्रेस सुरू करण्यासाठी ‘क्रांती’…!

387

क्रांती युवा संघटनेचे निवेदन

वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक रेल्वेगाड्या बंद केल्या होत्या. कालांतराने बहुतांश रेल्वेच्या फेऱ्या सुरू झाल्यात. परंतु वणीला थांबा असलेली आणि नागरिक व विद्यार्थ्यांच्या हिताची नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वेगाडी अद्याप सुरु करण्यात आली नाही. जनहित लक्षात घेता तात्काळ नंदीग्राम सुरु करावी अशी मागणी कांती युवा संघटनेने SDO यांना निवेदनातून केली आहे.

संपूर्ण देशात कोरोनाची लाट ओसारताना दिसत आहे. शासनाने लादलेल्या निर्णयात शिथिलता आली आहे. देश तसेच राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून अत्यावश्यक सेवा पूर्ववत कराव्यात अशी मागणी क्रांती युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

नंदीग्राम एक्सप्रेसला 22 मार्च 2007 रोजी वणीत थांबा मिळाला. तेव्हापासुन येथील जनतेसाठी ही एकमेव रेल्वेगाडी आहे. वणी वरून आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद व मुंबई अशा प्रमुख शहरातुन नंदीग्राम एक्सप्रेस जात होती. वणी येथुन एकमेव रेल्वे असल्याने वणीकर मोठ्या प्रमाणात नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करीत होते.

स्थानिक पातळीवरील व्यावसायिक, विद्यार्थी यांच्या दृष्टिकोनातून नंदीग्राम एक्सप्रेस वरदान आहे. परिसरातील विद्यार्थी मोठ्याप्रमाणात याच रेल्वेगाडीने नागपुर, औरंगाबाद व मुंबई येथे जाणे-येणे करतात. तर व्यावसायिकाना अदीलाबाद, नागपूर व्यावसायिक दृष्टीने हिताचे ठरते.

दोन वर्षापासुन रेल्वे बंद असल्याने जनतेला ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. हे अर्थीकदृष्ट्या अहितकारक आहे. सध्या महाविद्यालये सुरू करण्यात आले असुन बरेच विद्यार्थी नागपुर, औरंगाबाद व मुंबई येथे शिक्षण घेत आहेत. नंदीग्राम एक्सप्रेसने अवागमन व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरी नंदीग्राम एक्सप्रेस सुरू करावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा क्रांती युवा संघटनेचे संस्थापक राकेश खुराणा, अॅड. सुरज महारतळे व कार्यकर्त्यांनी केली आहे.
वणी: बातमीदार