Home Breaking News जर…बोगस बियाणे विकाल तर गाठ मनसेशी

जर…बोगस बियाणे विकाल तर गाठ मनसेशी

646
Img 20240930 Wa0028

उंबरकरांची बियाणे कंपन्याना ताकीद

वणी: प्रमाणित नसलेल्या बियाणांचा खप वाढविण्यासाठी आकर्षक जाहिराती व फसवा प्रचार – प्रसार केला जातो. शेतकरी कंपन्यांच्या प्रलोभनाला बळी पडतात आणि येथेच फसगत होते. यापुढे ज्या कंपनीचे वाण फसवे निघेल व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होईल अशांना मनसे धडा शिकवेल,असा गर्भित इशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी बियाणे कंपन्याना दिला आहे.

खरिपाची तयारी पूर्णत्वास आली आहे, बळीराजा मान्सूनच्या अगमनाकडे लक्ष देऊन आहेत. त्यातच खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. प्रतिबंधित असलेल्या बोगस बियाण्याची तालुक्यात होणारी विक्री आणि नवनव्या कंपन्यांची नावे सांगून शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे पुरवठा करणारे महाभाग सुद्धा कार्यान्वित झाले आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात कपाशीची लागवड मोठया प्रमाणात करण्यात येते. पांढरे सोने पिकवणारा हा भाग जिल्ह्यात अग्रेसर आहे. यामुळे विक्रेते स्थानिक कृषी केंद्र चालकांना हाताशी धरून आपले इस्पित साध्य करताहेत. प्रमाणित नसलेल्या बियाणांचा खप वाढविण्यासाठी उत्पादन क्षमता अधिक असल्याचे भासवून शेतकऱ्यांना फसविण्यात येत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

राज्यात 1 जून पूर्वी बियाणे विक्रीस शासनाने निर्बंध घातले होते. तसेच अनेक कंपन्यांनी परराज्यातून छुप्या पद्धतीने बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले असे निदर्शनास येत आहे. मागील कित्येक वर्षापासून बोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना सदोदित करावा लागतो. आता शेतकऱ्यांना गंडवले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रा घेणार आहे. यापुढे ज्या कंपनीचे वाण फसवे निघेल त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागड करून चमडी उतरल्या शिवाय मनसे शांत बसणार नाहीत अशी ताकीद राजू उंबरकर यांनी पत्रा द्वारें विभागांतील बियाणे कंपनीना दिली आहे.
वणी: बातमीदार