Home Breaking News ‘पोलीस’ जेव्हा Discipline Act विसरतात तेव्हाच अशा घटना घडतात..!

‘पोलीस’ जेव्हा Discipline Act विसरतात तेव्हाच अशा घटना घडतात..!

664

पोलीस कर्मचाऱ्यात समन्वयाचा अभाव

वणी: कर्तव्याचे पालन करतांना अधिकाऱ्यांनी सजग असणे गरजेचे आहे. ब्रिटिश कालखंडापासून शिस्त कायदा (Discipline Act) ला अनन्य साधारण महत्व आहे. वणी पोलीस ठाण्यात चाललेली अनागोंदी, दिशा भरकटलेला तपास, गुन्ह्याची वाढलेली व्याप्ती आणि अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यात असणारा समन्वय साधण्यात आलेले अपयश ठाणेदारांचे ‘मेरिट’ नव्हे तर त्यांची कार्यप्रणाली सिद्ध करते.

वणी ठाण्यात घडलेल्या ‘त्या’ घटनेमुळे पोलीस प्रशासनावर ओढवलेली नामुष्की ‘प्रशासनाच्या’ दृष्टीने क्षुल्लक असेल, मात्र वणीकर नागरिक कायम स्मरणात ठेवतील. ईजारा, वतनदारी, ‘बक्षिसी’ ज्यांना मिळते त्यांना ‘त्या’ मिळालेल्या बाबी गौण वाटतात. ‘खडतर’ प्रयत्न करून मिळणाऱ्या खुर्चीचा उपभोग घेताना यापूर्वीच्या ठाणेदारांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्ह्याचा आलेख (Crime graph) वाढू दिला नाही. तर राज्यपातळीवर सर्वोत्तम तपास केल्याची ख्याती प्राप्त केली.

ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांची विभागातील कारकीर्द विशेषत्वाने उल्लेखनीय आहे. त्यांनी गुन्हेगारांवर वचक तर मिळवलाच होता त्यातच तपास यंत्रणा दक्ष होती. शालेय विद्यार्थ्यांचा झालेला अपघात, शोकाकुल वणीकर आणि कुलकर्णी यांनी केलेला तपास, वाहन चालकाला झालेली शिक्षा, राज्यपातळीवर सर्वोत्तम तपास ठरला. समाज माध्यम, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांना मिळणारी वागणूक आणि सदोदित पोशाखावरील त्यांची उपस्थिती ‘दबंग’ होती.

मुकुंद कुलकर्णी नंतर आलेल्या ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी पूर्वीच्या ठाणेदारांचे बरेचशे गुण आत्मसात केले. ते रुजू होताच “शिशु अपहरणाची” मोठी घटना घडली. अवघ्या काही तासात ते बाळ मातेच्या हवाली करण्यात त्यांना यश आले. घटना, घडामोडी आणि गुन्हेगारांवर वचक मिळवण्यात त्यांना यश आले ते केवळ कर्मचाऱ्यातील समन्वयामुळेच.

ठाणेदार वैभव जाधव यांनी नागपुरातील गुन्हे (crime) विभाग संभाळल्याने त्यांना गुन्हेगार व त्यांची प्रवृत्ती चांगलीच अवगत होती. येथे रुजू झाल्यावर त्यांनी Discipline Act चा पुरेपूर वापर केला. ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्याप्रती सजग असावे व कर्तव्यपालन करताना जनहितार्थ उपलब्धी असावी हा त्यांचा सिद्धांत सफल झाला. तसेच सर्वाधिक कार्यकाळ त्यांनी वणी ची ठाणेदारकी उपभोगली.

ठाणेदार शाम सोनटक्के यांना वणी पोलीस ठाण्याची ‘लॉटरी’ लागल्या नंतर त्यांनी सर्वप्रथम येथील नागरिकांची मानसिकता ओळखली. अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना विश्वास देत कर्तव्यपूर्ती साठी तयार केले. गुन्ह्यावर नियंत्रण मिळवले, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. त्यांना मिळालेला अल्प कालावधी सुध्दा ‘लक्षणीय’ ठरला. मात्र त्यांच्या नंतर आलेल्या ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची कारकीर्द पुर्णतः असफल ठरल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. Discipline Act चा सर्वोतोपरी बोजवारा उडाला हे ‘त्या’ घटनेनंतर सिद्ध झाले आहे.
वणी: बातमीदार