● खा. धानोरकरांनी अधिकाऱ्यांसोबत साधला संवाद
● संजय खाडे यांनी दिला आंदोलनाचा ईशारा
Wani News | वणी उपविभागातील वेकोली निर्मित समस्यांची सोडवणूक व्हावी याकरीता खा. प्रतिभा धानोरकरांनी वेकोलीच्या भालर (वणी नॉर्थ एरिया) मधील मुख्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. याप्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सुचना केल्यात तर कॉग्रेसचे नेते संजय खाडे यांनी यावेळी महत्वपुर्ण समस्यांचे निवेदन देत पंधरा दिवसात निवारण करावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. Problems caused by coal mines in sub-division
वणी उपविभागात वेकोली मुळे विविध समस्येंचा भस्मासुर बोकाळला आहे. सर्वसामान्य जनतेला नाहक ञास सहन करावा लागत आहे. अधिकारी मनमानी पध्दतीने वागत असल्याने महत्वपुर्ण समस्येंचे निवारण होत नाही. अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. समस्यांची सोडवणूक करण्यासाठी खा. प्रतिभा धानोरकर सरसावल्या आहेत.
भालर वणी उत्तर क्षेत्रातील वेकोली अधिकाऱ्याची बैठक बोलावून विविध सुचना केल्या आहेत. याप्रसंगी वेकोली अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी परिसरातील समस्येंचे निवेदन सादर केले. यात प्रामुख्याने महत्वपुर्ण समस्यांचा उहापोह करण्यात आला आहे.
कोलेरा-पिंपरी गावाचे पुनर्वसन: कोळसा खाणींमुळे प्रभावित झालेल्या गावातील लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसन योजनेत शाळा, जिम, वाचनालय, सभागृह, पाणी टाकी आणि स्ट्रीट लाइट्ससारख्या सुविधांचा समावेश असावा.
स्थानिक बेरोजगारांना नोकरीची संधी: कोळसा खाणीमुळे 90% शेतजमिनीवर अवलंबून असलेले शेतमजूर बेरोजगार झाले आहेत. कमीत कमी 275 बेरोजगार युवकांना खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी देण्यात यावी. त्याप्रमाणेच कुभारखनी गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या नुकसानाबद्दल योग्य मोबदला आणि नोकऱ्या प्राप्त झालेल्या नाहीत. त्यांना योग्य मोबदला देऊन वेकोलीत नोकरीच्या संधी उपलब्ध कराव्यात.
कोळसा वॉशरीजमुळे होणारे नुकसान: ब्राम्हणी (निळापुर) येथील कोल वॉशरिजच्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे व आरोग्याचे जे नुकसान होत आहे त्याबाबत शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा तसेच वणी ते अहेरी रोड (बोरगाव) रस्त्यालगतची शेती धुलीकण प्रदुषणाने बाधीत झाली आहे तरी पिडीत शेतकऱ्यांना मागील 20 वर्षापासूनचा मोबदला देण्यात यावा.
ओव्हरलोड कोळसा वाहतुकीचा प्रश्न: ओव्हरलोड वाहतुकीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होतो आहे. अपघातांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे यामुळे वाहतुकीसाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.
गुंडा नाल्यावर पूल बांधण्याची मागणी: पावसाळ्यात वाहतूक ठप्प होण्याच्या समस्येचा गंभीर विचार करावा. गुंडा नाल्यावर सुरक्षित वाहतुकीसाठी पूल बांधावा. तसेच वेकोली परिसरातील झाडी, काटेरी झुडुपे साफ करून द्यावीत जेणेकरून वाघामुळे आणि इतर वन्य जनावरांमुळे जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
रस्ते दुरुस्तीची मागणी: लालगुडा ते उकनी आणि वणी ते प्रगतीनगर रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब आहे. तातडीने दुरुस्ती आणि मजबुतीकरण करावे. नमुद समस्यांवर त्वरित कारवाई करून जनतेच्या समस्यांचे निराकरण करावे, अन्यथा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असवा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.
Rokhthok News