● शिवसेना उपजिल्हा प्रमुख आक्रमक
● शनिवारी करणार चक्काजाम
Wani News | उपविभागात ओव्हरलोड अवजड वाहनाचे दळणवळण यामुळे रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांना नाहक यातना सहन कराव्या लागत आहे. तर लहानसहान अपघात नित्याचे आहे. रस्त्याचे तातडीने नवनिर्माण करावे अन्यथा चक्काजाम करण्यात येईल असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधाकर गोरे यांनी उप विभागीय अधिकारी यांना निवेदनातुन दिला आहे. Overloaded traffic, bad road conditions, angry villagers
तालुक्यातील पुरड ते कुंद्रा रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. कुंद्रा, कृष्णानपूर, मोहदा, वेळाबाई येथील विद्यार्थी, विद्यार्थिनींना याच भयावह मार्गावरून वणी, मुकुटबन, कायर येथे शिक्षण घेण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते. त्यातच रस्ते योग्य नसल्याने बससेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे. आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, रुग्ण यांना उपचारार्थ अन्यत्र जावे लागते. त्यांना होणारा त्रास अनाकलनीय आहे. यामुळे परिसरात कमालीचा रोष निर्माण झाला आहे.
परिसरात अनेक खनिजांच्या खाणी आहेत, माणिकगड, RCPL, अंबुजा, दालमिया, येलांती आदी उद्योग समूहातील कच्चा व पक्क्या मालाची अवजड वाहनातून होणारी ओव्हरलोड वाहतूक रस्त्याच्या दुर्गती करिता कारणीभूत ठरते आहे. मात्र वहन क्षमतेच्या कुवतीचे रस्ते संबंधित विभाग निर्माण करत नसल्याने स्थानिकांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार प्रशासनच असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
प्रशासनाने दोन दिवसात ठोस निर्णय घ्यावा अन्यथा शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनातुन स्पष्ट करण्यात आले. यावेळी सुधाकर गोरे, सचिन कुळसंगे, रवींद्र आसुटकर, प्रशांत पिदूरकर, देविदास भोसकर, श्रीकांत कोडपे, शंकर निखाडे, नारायण कोडापे, सुनील पिदूरकर यांच्या सह अनेकांनी निवेदनावर स्वाक्षरी केल्या आहेत.
Rokhthok News