Home Breaking News आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना अर्थसाहाय्य

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना अर्थसाहाय्य

नाम फाऊन्डेशनने दिला मदतीचा हात

वणी: सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून उभी राहलेली नाम फाउंडेशन मागील सात वर्षापासून शेतकरी व शेतकरी कुटुंबांकरिता कार्य करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना आधार देण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 389 महिलांना अर्थ साहाय्य करून मदतीचा हात दिला आहे.

नाम फाउंडेशन चे विदर्भ व खानदेश समन्वयक हरीश इथापे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक नितीन पवार यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 16 तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 389 महिलांना प्रती महिला पंचवीस हजार रुपयाची सानुग्रह राशी देण्यात येत आहे.

नाम फॉउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून वणी व मारेगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुंटूबातील 56 लाभार्थीना येथील धनोजे कुणबी सांस्कृतिक भवन, येथे गुरुवार दि 31 मार्चला धनादेश वाटप करण्यात आले. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना साडी-चोळी भेट दिली.

Img 20250103 Wa0009

आयोजित कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, SDO डॉ. शरद जावळे, दिलीप अलोणे, ठाणेदार रामकृष्ण महल्ले, मारेगाव चे ठाणेदार अमोल पुरी, जिल्हा समन्वयक नितीन पवार, तालुका समन्वयक धीरज भोयर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन स्वाती ठेंगणे यांनी केले तर नाम फाऊन्डेशनचे सचिन साकरकर, राजेश पाहापळे, संजय पेचे, मुरलीधर भोयर, राधा दरेकर, कुणाल नागमोते यांनी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार