Home Breaking News शासनाचा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक

शासनाचा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक

308
पोलीस भरती प्रक्रियेतील जाचक अट रद्द करा
मुख्यमंत्री यांना पाठवले निवेदन

वणी: जिल्हा पोलीस भरतीसाठी दिनांक 2 मार्च 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे एनसीसी प्रमाणपत्र धारक उमेदवाराला 5 टक्के वाढीव गुण देण्यात येत आहे. शासनाचा हा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. तरी वाढीव गुण देणे तत्काळ बंद करावेत अशी मागणी येथील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विध्यार्थानी SDO मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

राज्यात 7231 पदाच्या पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस भरतीची जोरदार तयारी करत असताना विद्यार्थ्यांना गडचिरोली जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत शासन निर्णय 2 मार्च 2020 च्या प्रमाणे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना 5 टक्के अतिरिक्त गुण वाढवून देत असल्याचे निदर्शनास आले.

शासनाचा हा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. राज्यात ग्रामीण भागातील अनेक विद्यालय व महाविद्यालयात N.C.C. चे युनिट नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना N.C.C. मध्ये सहभाग घेता येत नाही. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे मत विद्यार्थ्यांनी निवेदनातून व्यक्त केले आहे.

एनसीसी प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्यास विद्यार्थ्यांचा विरोध नाही. मात्र 5 टक्के अतिरिक्त गुण देण्याच्या विरोध पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दर्शविला आहे. तरी वाढीव गुण हे अन्यायकारक असून ते तत्काळ बंद करावेत. अशी मागणी येथील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विध्यार्थानी निवेदनातून केली आहे.

येथील काँग्रेसचे नेते डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी प्रो. दिलीप मालेकर, वैभव ठाकरे, प्रमोद वासेकर व प्रमोद निकुरे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.
वणी: बातमीदार