● पेटूर येथील घटना, जावई पोलिसांच्या ताब्यात
रोखठोक | येथून जवळच असलेल्या पेटूर या गावी तीन बैलांना विष पाजून ठार केल्याची घटना दि 22 डिसेंबर ला घडली होती. या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. शेतकऱ्याच्या जावयानेच विष पाजल्याचे उघड झाल्याने वडजापूर येथील संदीप बंडू वाढई (40) या जावयाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

● जावयाने काढला वचपा ●
संदीप वाढई हे ठावरी यांचे जावई आहेत मात्र ते मुलीला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने ठावरी यांनी मुलीला माहेरी आणले. पत्नीला तिचे वडील घेऊन गेल्यामुळे संदीपने वचपा काढण्याचे ठरवले आणि निष्पाप बैलांचा जीव घेतला असे तपासात उघड झाले आहे.
पेटूर येथे वास्तव्यास असलेले गणपत ठावरी यांच्या गोठ्यात बांधून असलेल्या तीन बैलांना थीमेट नावाचे विषारी औषध पाजले होते. या मध्ये तीन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. समाजकंटकाने केलेले कृत्य अशोभनीय होते. या घटनेने शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
या घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. घडलेली घटना अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने वणी पोलिसांनी अज्ञातां विरुद्ध गुन्हा नोंद केला होता. या घटनेचा तपास करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. अवघ्या तीन दिवसातच आरोपीचा छडा लावण्यात यश आले आहे.
निष्पाप जीवांच्या मृत्यू प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली ASI डोमाजी भादीकर, विठ्ठल बुरुजवाडे, सागर सिडाम यांनी शिताफीने तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
वणी : बातमीदार