●मनसे वाहतूक सेनेची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
Wani News
शहरातील रस्त्याच्या कडेला लघु व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या फेरीवाल्यांवर वाहतूक पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमणाच्या नावाखाली शिवीगाळ व साहित्य जप्तीसारख्या दंडेलशाही कारवाया सुरु असल्याचा आरोप मनसे वाहतूक सेनेने केला आहे. या संदर्भात राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. Traffic police’s brutality against hawkers, MNS vahatuk sena complains to Superintendent of Police
बेरोजगारीमुळे अनेक गरीब महिला व पुरुष रस्त्याच्या कडेला फळे, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी या व्यवसायिकांशी अर्वाच्छ भाषेत बोलत त्यांचे साहित्य जप्त करत असल्याचा आरोप मनसेने निवेदनातुन केला आहे. यामुळे लघु व्यावसायिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
मनसेने स्पष्ट केले की, रस्त्यांवरील अतिक्रमणास पक्षाने कधीही पाठिंबा दिला नाही. पण, अडथळा निर्माण करणाऱ्यांवर योग्य पद्धतीने समज देणे अपेक्षित आहे. फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई करताना शहरातील दुकानदारांकडून होणाऱ्या अतिक्रमणाकडे मात्र वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत, असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे.
मुख्य बाजारपेठेत एका दुकानासमोर चार वाहनांच्या जागी 10 ते 12 वाहने लावली जात असून, यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. शाळा सुरू झाल्याने गणवेश व इतर खरेदीसाठी गर्दी वाढली असून, ग्राहकांनाही पायी चालणे कठीण झाले आहे. अशा वेळी वाहतूक पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत, यामागे काही “विशेष गिफ्ट” घेतली जात असल्याचा संशय मनसेने व्यक्त केला.
तरी रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना समज देऊन ताकीद द्यावी, परंतु त्यांच्याशी अर्वाच्छ भाषा व असभ्य वर्तन करू नये. अशा कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी जोरदार मागणी इरशाद खान यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
Rokhthok News






