Home Breaking News गुणवंत…. अंजली बलकी व मयूर वाढई यांचा ‘गौरव’

गुणवंत…. अंजली बलकी व मयूर वाढई यांचा ‘गौरव’

637

अव्वल विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी गाठले घर

वणी: यशाची परंपरा कायम ठेवत जनता विद्यालयाने यावर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च शिक्षण मंडळाद्वारे मार्च 2022 मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या दहावीच्या परीक्षेत बाजी मारली. जनता विद्यालयाची अंजली बल्‍की तालुक्यात अव्वल आली तर जनता शाळेचाच विद्यार्थी मयूर वाढई ने द्वितीय स्थान पटकावले.

दहावी परिक्षेचा ऑन लाईन निकाल मंडळाने आज जाहिर केला आहे. यात जनता विद्यालयाची अंजली बल्‍की हिने 94.80 टक्‍के गुण प्राप्‍त करून तालुक्‍यातुन प्रथम येण्‍याचा मान मिळवला आहे. तर याच शाळेचा मयूर अनिल वाढई 94.60 टक्‍के घेवून दुसरा आला आहे.

जनता शाळेतील 392 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यातील 89 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 158 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर द्वितीय व तृतीय श्रेणीत 131 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी शाळेचा एकूण निकाल 96.42 टक्के लागला आहे.

जनता विद्यालयातील अंजली व मयूर यांनी तालुक्यातून अव्वल येण्याचा मान पटकावल्याने संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे व शाळा प्रशासन यांनी उज्वल यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी करकीर्दी करिता शुभेच्छा दिल्या आहेत. तर मुख्याध्यापक गणेश खंडाळकर, सहा.शिक्षक गजेंद्र काकडे, राजेंद्र जेनेकर, सुनील झाडे ,भालचंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे घर गाठून शाबासकीची थाप दिली आहे.
वणी: बातमीदार