● 400 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद
● सतरा ग्रामपंचायतीत 83 टक्के मतदान
रोखठोक | तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाकरिता 56 तर सदस्यांसाठी 344 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. निवडणूक शांततेत पार पडली असून अंदाजे 80 ते 85 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 17 सरपंच व 137 सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

वणी तालुक्यात 19 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. त्यापैकी अहेरी येथील निवडणूक अविरोध तर शिंदोला येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. साखरा(दरा), बोर्डा, कळमना, कायर, पुरड, मंदर, केसुरली, चिखलगाव, कुरई, वेळाबाई, चारगाव, वारगाव, गणेशपूर, ब्राम्हणी, रांगणा, वरझडी, मेंढोली या 17 ग्रामपंचायतीचे मतदान निर्विघ्न पार पडले.
तालुक्यातील चिखलगाव, गणेशपूर व कायर येथील निवडणूक भाजपा, काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) या पक्षातील राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे रंगतदार व चुरशीची झाली आहे. चिखलगाव येथे शिवसेनेचे सुनील कातकडे व भाजपाचे संजय पिंपळशेंडे, गणेशपूरला खासदारांचे निकटस्थ काँग्रेसचे तेजराज बोढे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी रविवार दि. 18 डिसेंबरला मतदान पार पडले. 54 मतदान केंद्रावर 11 हजार 663 स्त्री व 12 हजार 601 पुरुष असे 24 हजार 264 मतदार होते. प्रथमदर्शनी अंदाजे 83 टक्के मतदान झाले आहे. उप विभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार निखिल धुळधर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रवींद्र कापसीकर व कर्मचाऱ्यांनी काटेकोर नियोजन केले होते.
वणी : बातमीदार