● शेतातील कचऱ्याला आग लावताना निष्काळजीपणा, 50 हजारांचे नुकसान
Rokhthok | तालुक्यातील गोंडबुरांडा येथे शेतातील कचरा जाळताना झालेल्या निष्काळजीपणामुळे शेजारील शेतकऱ्याचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर जातिवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. Casteist abuse, case registered
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुळशिराम लेतु आत्राम (60), रा. गोंडबुरांडा हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्या शेजारील शेत ठेक्याने करणारा प्रविण अशोक राजुरकर (35) याने 21 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास शेतातील धुरा व कचऱ्याला आग लावली.
या आगीत फिर्यादी यांच्या शेतातील 1 जांभुळ, 2 लिंबू व 1 आंब्याचे झाड तसेच 10 ते 15 प्लास्टिक स्प्रिंकलर पाईप जळून खाक झाले. 22 एप्रिल रोजी सायंकाळी फिर्यादी शेतात गेले असता ही बाब उघडकीस आली. याबाबत शेतमजूर महिलेनेही आरोपीने आग लावल्याची माहिती दिली.
दरम्यान, नुकसान भरपाईची मागणी केल्यावर आरोपीने नकार देत फिर्यादीला जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. “तुम्हाला कुठे जायचे असेल तेथे जा, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 326 (F) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(1)(g) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी SDPO सुरेश दळवी करीत आहेत.
-बातमीदार-






