
● शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आर्थिक दिलासा
● बोदकुरवारांनी मानले “देवाभाऊ”चे आभार
Political News :
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने इतिहास घडवला आहे! अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेती हंगामावर सरकारने तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदतीचा पाऊस पाडला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे वणी, झरी-जामणी आणि मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे, अशी माहिती माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. Heavy rains, help pouring in for farmers!
पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलूरकर, संजय पिंपलशेंडे, माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर, दिनकर पावडे, गजानन विधाते, शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, प्रा. महादेव खाडे, मीरा पोतराजे, नितीन वासेकर उपस्थित होते.

बोदकुरवार म्हणाले की, शेतकऱ्यांना हेक्टरनिहाय थेट आर्थिक मदत देण्याचा “न भूतो न भविष्यती” निर्णय सरकारने घेतला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतींना 27 हजार आणि बागायती शेतकऱ्यांना 32 हजार 500 रुपये मिळणार आहेत. मदतीची मर्यादा 2 वरून 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, पिकविमा घेतलेल्या 45 लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 17 हजार रुपयांची अतिरिक्त मदत देण्यात येईल. दरड कोसळणे, जमिन वाहून जाणे किंवा नदीपात्र बदलल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांना 47 हजार रुपये प्रती हेक्टर मदत मिळणार आहे. तसेच गाळ साचलेल्या जमिनीसाठी 18 हजार रुपये प्रती हेक्टर अशी तरतूद आहे.
घरांचे व संपत्तीचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांतून थेट आर्थिक मदत दिली जाणार असून, पडझड झालेल्या घरांना पंतप्रधान आवास योजनेतून नवीन घरे मिळतील. दुकान, झोपडी, गोठे, भांडी-कपड्यांचे नुकसानही सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार भरून काढले जाणार आहे.
सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी दिलासादायक निर्णय घेतले असून, महसूलात सूट, पिककर्ज पुनर्गठन, एक वर्षाची वसुली स्थगिती, तिमाही वीजबिल माफी, शाळा-परिक्षा शुल्क सवलत, रोहयोतील शिथिलता आणि शेतीपंप जोडणी न तोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.
राज्यातील कोणत्याही सरकारने यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर मदत दिली नव्हती. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास सुरूवात झाली आहे. याप्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसेच महायुती सरकार हे शेतकरी हित जोपासणारे असल्याचे स्पष्ट केले.
Rokhthok






