Home Breaking News चक्क….शहरातून होतेय ओव्हरलोड वाहतूक

चक्क….शहरातून होतेय ओव्हरलोड वाहतूक

IMG 20260522 WA0013

वाहतूक शाखा निद्रिस्त, कारवाई कोण करणार..!

सुनील पाटील : शहरातून अवजड वाहनाला मनाई करण्यात आली आहे. तरी भल्या पहाटे तथा दिवसभर शहरातून रेती भरलेली अवजड वाहने भरधाव हकण्यात येत आहे. यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्थानिक नागरिकांसह समाजवादी पक्षाचे नेते रज्जाक पठाण यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी रास्त मागणी निवेदनातून SDO यांना केली आहे.

वाहतूक शाखा व प्रशासन निद्रिस्तावस्थेत असल्याने दाद कोणाला मागावी असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. वणी परिसरातील वाहतुक व्यवस्था पुर्णतः ढेपाळली आहे. अस्ताव्यस्त वाहतुकीवर लगाम लावण्याचे धोरण बाजुला सारत ग्रामिण भागातील नागरीकांना चालान स्वरुपी आर्थिक भुर्दंड बसविण्याचा विडा उचलणाऱ्या वाहतुक शाखेला वठणीवर आणण्या करीता स्थानिक नागरिक सरसावले आहेत.

IMG 20260511 WA0005

शहरातील ब्राम्हणी फाटा, इंदिरा चौक, टिळक चौक तसेच दीपक चौपाटी परिसरातून शहराच्या दिशेने रेतीची वाहतूक अवजड वाहनातून बिनधास्त करण्यात येत आहे. वाहतूक शाखा पूर्णतः बेजबाबदारपणे वागताना दिसत आहे. शहरातील लहानसहान व्यावसायिकांना धाक दाखविण्यातच स्वतःचा शहाणपणा सिद्ध करत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

Img 20250103 Wa0009

वणी शहरात तात्कालीन उपविभागीय अधिकारी व रस्ता सुरक्षा अधिकारी यांनी व्यापाऱ्यांचा विरोध घेत एकेरी वाहतुकीची संकल्पना अमलात आणली होती. सोबतच शहर व परिसरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला शिस्त लागावी याकरीता जिल्हा वाहतुक शाखेने उप शाखेचे निर्माण केले होते. सध्यस्थितीत शहरातील एकमार्गी वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पराक्रम कोणत्या अधिकाऱ्याने केला हे तपासणे गरजेचे झाले आहे.

टार्गेट च्या नावाने टिपतात सावज 
वाहतूक पोलिसांना प्रतिदिन ठराविक टार्गेट दिल्या जाते त्यामुळे त्यांना नियमाचा बडगा उगारून सावज टिपावे लागत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही त्या उलट शहरात चालणाऱ्या अवैध्य प्रवाशी वाहनावर तसेच अस्ताव्यस्त वाहतुकीवर करण्यात येणारी मेहेरनजर मात्र संशोधनाचा विषय आहे.

वाहन चालक टोल टॅक्स बाचविण्याकरिता वणीकरांच्या जीवाशी खेळ करीत आहे. अरुंद रस्ते व ओव्हरलोड वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी शहरातील अवजड वाहतूक त्वरीत बंद करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी रज़्ज़ाक़ पठाण, नितिन शिरभाते, पियूष चव्हाण, अमोल धानोरकर, शेख् शगीर शेख इब्राइम, राजू चौधरी, प्रीतम इसनकर, विलास चिट्टलवार, पिंटू डगावकर, संतोष लक्षत्तीवर यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार