● बेजबाबदार शालेय ऑटो व स्कूल बसवर कारवाई करा..!
Wani News
शहरातील प्रमुख शिक्षण संस्थेत शाळा सुरू झाल्यापासूनच दररोज सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यांवर अप्रमाणित, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेणाऱ्या ऑटो, बस आणि खासगी वाहनांचा सुळसुळाट सुरू असतो. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी वणी वाहतूक शाखेकडे निवेदन सादर करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. Really…playing with the lives of school children…!
शहरातील अनेक शाळांमधून धोकादायक रीतीने भरगच्च भरलेली ऑटो रिक्षा आणि शालेय बस धावतात. क्षमतेपेक्षा जास्त मुले घेणारी वाहने कोणतीही सुरक्षा न पाळता शाळांमध्ये ये-जा करत आहेत. अशा वाहनांवर नियंत्रण नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

इरशाद खान यांच्या मते, वारंवार तक्रारी करूनही स्थानिक पोलीस व वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करत आहे. वाहनांची तपासणी नाही, परवाने नाहीत, विमा नाही, तरीही ही वाहने बेधडक शाळांपर्यंत धावतात. शासन आणि पोलिस प्रशासनाचे या गंभीरबाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
अशा अप्रमाणित वाहनांवर तातडीने कारवाई करून शाळा वेळेत विशेष मोहीम हाती घेण्यात यावी. क्षमतेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करावेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी कठोर नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर मनसे वाहतूक सेनेकडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
Rokhthok News






