● वणी परिसरात शिरकाव, वाहतूकदार संतप्त, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार…..
ROKHTHOK | यवतमाळ जिल्ह्यातील करंजी येथील महामार्ग पोलीस चौकीत सुरू असलेल्या अवैध वसुलीच्या प्रकारांनी आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. हा ‘अनागोंदी’ कारभार वणी परिसरातील वणी–घुग्घूस मार्गावर उघडपणे सुरू असल्याचा आरोप मनसे वाहतूक सेनेने केला आहे. या प्रकरणी राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी थेट मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करत संताप व्यक्त केला आहे. The functioning of the highway police is in the spotlight..!
वणी परिसरात महामार्ग पोलिसांनी आपला ‘मोर्चा’ वळवून वाहनधारकांकडून ‘वसुली’ सुरू केल्याने वाहतूकदार त्रस्त झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक वाहतूक शाखा अस्तित्वात असतानाही महामार्ग पोलिसांकडून अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महामार्ग पोलिसांची प्राथमिक जबाबदारी अपघातांचे नियंत्रण, वाहतुकीचे नियमन आणि प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देणे ही आहे. प्रत्यक्षात मात्र काही अधिकारी आपले कर्तव्य विसरून आपले ‘आर्थिक उद्दिष्ट’ पूर्ण करण्यासाठी या मार्गावर मोर्चा वळवल्याचा गंभीर आरोप मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी केला आहे.
“महामार्ग पोलीसच जर वणी परिसरात येऊन सर्व कारभार पाहणार असतील, तर स्थानिक वाहतूक उपशाखेचा ‘पांढरा हत्ती’ कशासाठी पोसायचा?” असा जळजळीत सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. महामार्ग पोलीस आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर येऊन वणी परिसरात हस्तक्षेप करत असल्याने स्थानिक वाहतूक शाखेला कोणतेही काम उरले नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
वणी परिसरातील बेकायदेशीर वसुलीला त्वरित आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या आरोपांमुळे महामार्ग पोलीस यंत्रणेची प्रतिमा मलिन होत असून, महामार्ग पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवत, यागंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.






