● ग्रामपंचायतीत अनियमितता, तक्रार मुख्यमंत्र्यांच्या दरबारात..
Rokhthok | वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील ग्रामपंचायतीत आर्थिक अपहार, शासकीय मालमत्तेचा गैरवापर आणि विविध गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी गावातील रहिवासी मनोज सुधाकर नवले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे निवेदन सादर करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. Sand disposal, serious allegations against Sarpanch and Upsarpanch!
मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने शासन नियमांना हरताळ फासत लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने शासनाने जप्त केलेल्या रेतीची बेकायदेशीर विल्हेवाट लावून न्यायालयात खोटी माहिती सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रत्यक्षात खरेदी न केलेल्या सुमारे 400 ब्रास रेतीची खोटी नोंद दाखवून लाखोंचा आर्थिक घोटाळा केल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे मनरेगा अंतर्गत झालेली कामे निकृष्ट दर्जाची असून निधीच्या अपहाराचा संशय व्यक्त केला. तर नव्याने बांधलेल्या सिमेंट रस्त्यांवर भेगा पडल्याने त्यावर डांबर टाकून “जुगाड” उपाय करून परिणामी शासकीय पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोबतच शासकीय जागांवर अतिक्रमणाला थेट प्रोत्साहन देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीतील मनमानी कारभारामुळे तब्बल आठ सदस्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली असून गावातील प्रशासन पूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे. या अनागोंदी प्रकरणी भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
संबंधितांवर तात्काळ गुन्हा नोंदवून निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई तसेच अपहाराची रक्कम वसूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या गंभीर आरोपांमुळे चिखलगावात खळबळ उडाली असून शासन या प्रकरणी कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
● बातमीदार






