● आपत्तीत पशुधनासाठी धावले ‘उंबरकर’
वणी: उप विभागात पावसाने बळीराजाचे स्वप्न हिरावले. शेती पाण्याखाली गेली, घरदार सोडायची वेळ आली. आपण कसंतरी जगू पण या मुक्या जनावरांचे काय ? असा प्रश्न घोंगावत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर धावून आलेत. स्थलांतरित कॅम्प मधील नागरिकांना तर मदत केलीच शिवाय मूक प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविल्याने ‘माणुसकी’ चा प्रत्यय आला.

‘राजकारण गेलं चुलीत’ असं मनाशी ठाम निश्चय करत आपल्या जवळच्या, दररोज दिसणाऱ्या आपल्या माणसाच्या जीवनात नैसर्गिक आपत्ती यावी हे दुर्दैव. त्यातच राबराब राबून काळ्या मातीत स्वप्न पेरणारा शेतकरी हतबल व्हावा आणि पुढाऱ्यांनी त्याचं राजकारण करावं हेच न पटल्याने उंबरकरांनी पहिल्या दिवसापासून मदतीचा सपाटा लावला आहे. त्यातच मुक्या जनावरांच्या पोटाची खळगी भरावी म्हणून चाऱ्याची व्यवस्था करण्यात आल्याने पशुधन सुद्धा हरखले आहेत.
तालुक्यातील तब्बल 14 गावे पूर बाधित क्षेत्रात येतात, यातील 11 गावाला पुराच्या पाण्याने कवेत घेतले आहे. नदीकाठावरील गावांना चांगलाच फटका बसला आहे. अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहे. पधुधन उघड्यावर आले आहे. सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आपापल्या परीने मदत करताहेत. रेस्क्यू कॅम्प उभारण्यात आले आहेत. मात्र आद्यप चारा छावण्या निर्माण करण्याचे धारिष्ट शासन, प्रशासनाने दाखवले नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण महीला सेनेच्या जिल्हा अध्यक्ष अर्चना बोदाडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सैनिकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सावर्ला, झोला व कोना येथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ वाढला आहे. महीला सेनेच्या वतीने सॅनिटरी न्यापकिन वाटप करण्यात आले. सदर मदत ही नायगाव येथील आशा स्वयं सेविकांना सुपूर्द करण्यात आली आहे.
यावेळी मदत कार्यात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्ष अर्चना बोदाडकर, मनसेचे माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तालुका उपाध्यक्ष प्रवीण डाहुले, वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे, विलन बोदाडकर, अरविंद राजुरकर, संकेत पारखी आदी उपस्थित होते.
वणी: बातमीदार